आज १ फेब्रूवारी कल्पना चावला स्मृतीदिन,
बरोबर तेरा वर्षांपूर्वीची, एक फेब्रुवारी 2003ची अमेरिकेतली सकाळ. पृथ्वीवर परतायला केवळ 16 मिनिटे असताना, नऊ वाजता "कोलंबिया‘ यानाशी संपर्क पूर्णपणे तुटला आणि काही क्षणातच टेक्सासमधील काही लोकांनी निळ्या आकाशात पृथ्वीच्या दिशेने झेपावणारी एक जळती रेषा पाहिली. पाठोपाठ एका जबरदस्त स्फोटाचा आवाज ऐकला. श्वास रोखून नियंत्रण कक्षात बसलेल्या "नासा‘च्या वरिष्ठ अधिकाऱ्याला "कोलंबिया‘ यान जळून नष्ट झाल्याची अतीव दुःखद बातमी जाहीर करावी लागली. "कोलंबिया मिशन‘ हे तिचे दुसरे अवकाश उड्डाण होते.
कोलंबियाच्या अपघाताची कारणे शोधताना असे आढळून आले, की उड्डाणाच्या वेळी इंधनाच्या टाकीवरील तापमानरोधकाच्या फोमचा एक तुकडा निसटला आणि शटलच्या पंखावर आपटला. यामुळे त्याच्या तापमानरोधक प्रणालीचे नुकसान झाले. त्यामुळे परतीच्या प्रवासात वातावरणात पुनर्प्रवेश करताना हवेच्या घर्षणामुळे निर्माण झालेल्या प्रचंड उष्णतेमुळे शटल नष्ट झाले.
कल्पना चावला आणि तिच्याबरोबरचे यानातील आणखी सहा अंतराळवीर अवकाश संशोधनाच्या रणांगणात हुतात्मा झाले. एखाद्या उल्केप्रमाणे कल्पना क्षणार्धात अंतर्धान पावली; परंतु तिने असंख्य तरुणींना प्रेरणा देणारा एक लखलखता तारा चमकत ठेवला.
कऱ्हाड शहरात तिच्या नावाचे विज्ञान केंद्र उघडण्यात आले आहे व अवकाशशास्त्र-अभ्यासक्रमाकडे विद्यार्थिनींचा कल वाढल्याचे वृत्त आहे. तिला मानवंदना म्हणून तेव्हाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यावेळी नुकत्याच प्रक्षेपित करण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या हवामान उपग्रहाचे नामकरण ‘कल्पना‘ असे केले. ‘अग्नी-5‘ची अभियानप्रमुख टेसी थॉमसने ‘भारताची अग्निपुत्री‘ किताब मिळवला आहे.
मी जेथे जेथे विद्यार्थ्यांना "अवकाश संशोधन‘ या विषयावर प्रबोधन करण्यासाठी जातो, तेथे तेथे कल्पना चावलाने आपल्या कर्तृत्वाने, स्वप्नपूर्तीसाठी केलेल्या कष्टांनी शेकडो-हजारो तरुण-तरुणींपुढे आदर्श निर्माण केला आहे, हे अनुभवायला येते. "अंतराळवीर बनण्यासाठी काय करायला हवं?‘ हा त्यांचा एक नित्याचा प्रश्न असतो. कल्पना हे नाव, शक्ती व धैर्य यांच्याशी जोडले गेले आहे.
एक जुलै 1961ला, कर्नालच्या एका छोट्या गावात जन्मलेली कल्पना हे बनारसीलाल व संयोगिता या जोडप्याचे अपत्य. लहानपणापासून ताऱ्यांकडे झेपावण्याच्या तिच्या स्वप्नाने हळूहळू एका ध्येयाचे रूप घेतले. ते ध्येय साकार करण्यासाठी तिने आपला जीव ओतला. पंजाब विद्यापीठातून एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेऊन तिने कोलोराडो विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून डॉक्टरेट प्राप्त केली. डिसेंबर 1997 मध्ये तिची अमेरिकेतील "नासा‘मध्ये अंतराळवीर समूहात निवड झाली आणि ध्येयपूर्तीच्या दिशेने तिने पहिले पाऊल टाकले. मिशन विशेषज्ञ म्हणुन तिने "एसटीएस‘वर काम केले भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला असा विक्रम प्रस्थापित केला. 2003चे कोलंबियाचे मिशन हे तिचे दुसरे अवकाश उड्डाण होते.
8 जुलै 2011 ला स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजून 26 मिनिटांनी फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरील केनेडी स्पेस सेंटरच्या अवकाशतळावरून ऍटलांटिस या स्पेस शटलच्या अखेरच्या 12 दिवस मदतीच्या उड्डाणाद्वारे स्पेस शटल पर्वाची सांगता झाली आहे. गेल्या तीस वर्षांमध्ये स्पेस शटलच्या पाच फेरवापर करण्यायोग्य यानांच्या समूहाने (कोलंबिया, चॅलेंजर, डिस्कव्हरी, ऍटलांटिस व एंडीव्हर) एकूण 135 मोहिमांमध्ये सुमारे 24 कोटी कि.मी.चा प्रवास केला व अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी बजावली. जुलै 2011मधील त्याचे अखेरचे उड्डाण हा अवकाश संशोधनाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड मानला जातो.
शटल कार्यक्रम समाप्त करण्याचे मुख्य कारण म्हणजे शटलचे वय होय. प्रत्येक शटलच्या रचनेनुसार त्यांची वापरण्याची मर्यादा 100 मोहिमा किंवा 10 वर्षे इतकी होती. कोणत्याही शटलने 50 मोहिमाही पूर्ण केल्या नसल्या, तरी सर्वांनी 10 वर्षांची सीमारेषा ओलांडली आहे. तिन्ही शटल्सना देशातील वेगवेगळ्या म्युझियममध्ये ठेवण्यात आले आहे. नवीन याने बनवण्यासाठी खासगी कंपन्यांना कंत्राटे दिली गेली आहेत. ही शटल्स उपलब्ध होईस्तोवर "आयएसएस‘पर्यंत ये-जा करण्यासाठी रशियाचे "गोयुझ‘ हे यान वापरण्याकरिता त्यांच्याशी करार करण्यात आलेला आहे.
दोन दुःखद अपघातांमुळे "चॅलेंजर‘ व "कोलंबिया‘ ही शटल्स आणि एकूण 14 अंतराळवीर जगाने गमावले.
कल्पना चावलाने स्वप्नपूर्तीसाठी स्वत:चं आयुष्य खर्ची घातलं; परंतु नवीन क्षितिजाच्या शोधात असलेल्या तिच्यासारख्या असंख्य तरुण-तरुणींच्या स्वप्नांमध्ये "कल्पना‘ नेहमीच अमर राहील.
- सुरेश नाईक, माजी समूह संचालक, "इस्रो‘
साभार esakal.com
